चालू घडामोडी आणि दिनविशेष - 10 एप्रिल 2023

Date : 10 April, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :

 

ऑर्लिन्स मास्टर्स बॅडिमटन स्पर्धा : प्रियांशू राजावतला विजेतेपद
  • भारताच्या प्रियांशू राजावतने कारकिर्दीतले पहिले मोठे विजेतपद मिळवताना ऑर्लिन्स मास्टर्स बॅडिमटन स्पर्धा (सुपर ३०० दर्जा) जिंकली. प्रियांशूने रविवारी झालेल्या अंतिम लढतीत डेन्मार्कच्या मॅग्नस जोहान्सेनवर ६८ मिनिटांच्या संघर्षपूर्ण लढतीनंतर २१-१५, १९-२१, २१-१६ असा विजय मिळवला.
  • थॉमस चषक स्पर्धेतील विजेत्या संघातील सदस्य आणि या वर्षीचा राष्ट्रीय स्पर्धेतील उपविजेता प्रियांशू व मॅग्नस दोघांनीही पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश करताना अंतिम फेरी गाठली होती.
  • दोघांनी सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन केले. यामध्ये प्रियांशूने बाजी मारली. प्रियांशूच्या विजेतेपदाचे वैशिष्टय़ म्हणजे या स्पर्धेत त्याने अंतिम फेरीपर्यंत एकही गेम गमावला नव्हता. आक्रमणावर कमालीचे नियंत्रण राखताना प्रियांशूचे क्रॉसकोर्ट फोरहॅण्ड आणि स्मॅश मॅग्नससाठी आव्हानात्मक ठरले. गेल्या वर्षी या स्पर्धेला ‘सुपर १००’ दर्जा होता, तेव्हा प्रियांशूला पहिल्या फेरीतच पराभूत व्हावे लागले होते. याच वर्षी या स्पर्धेचा दर्जा ‘सुपर ३००’ करण्यात आल्यावर प्रियांशूने आपल्या सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन केले. जोहान्सेनने सुरुवातीला प्रियांशूला चांगले रोखले होते.
  • प्रतिस्पर्धी अधिक आक्रमक होणार नाही, याची काळजी त्याने घेतली होती. यानंतरही प्रियांशूने कमालीचा नियंत्रित खेळ करताना ६-५, ९-७, १८-११ अशी आघाडी वाढवत नेली आणि पहिला गेम जिंकला.
अयोध्येत बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येत मोठी घोषणा केली आहे. प्रभू श्री रामचंद्राच्या जन्मस्थळी अयोध्या येथे हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारणार, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. यासंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सकारात्मक भूमिका आहे, असेही मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले.
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी ( ९ मार्च ) अयोध्येत रामलल्ला आणि मंदिराचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी भेटी दिल्या. मुख्यमत्री शिंदे यांनी राम मंदिरा, हनुमात गढीला भेट देत शरयू नदीवर महाआरती केली. तसेच, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही एकनाथ शिंदेंनी भेट घेतली आहे.
  • प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “अयोध्येत राम मंदिर व्हावे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि तमाम राभक्त हिंदुत्ववाद्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. रामाच्या आशीर्वादानेच आपल्याला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाले.”
  • “अयोध्या आणि राम आमच्या राम मंदिर हा आमच्यासाठी राजकारणाचा नव्हे तर सर्वांसाठी श्रद्धेचा, अस्मितेचा, हिंदुत्वाचा विषय आहे. त्यामुळे हिंदुत्वाला विरोध करणाऱ्यांची दुकाने आता बंद होतील,” असा टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला लगावला आहे.
१९७३ मध्ये भारतात होते अवघे २६८ वाघ, आता संख्या झाली ३ हजार १६७; ५० वर्षांत काय काय घडलं?
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रोजेक्ट टायगरला ५० वर्षे पूर्ण झाल्याचं औचित्य साधत देशातल्या वाघांची संख्या जाहीर केली. देशात ३ हजार १६७ वाघ आहेत. १ एप्रिल १९७३ ला जिम कॉर्बेट अभय अरण्यातून इंदिरा गांधींनी प्रोजेक्ट टायगर सुरू केला होता. त्यावेळी म्हणजे १९७३ मध्ये वाघांची संख्या २६८ होती. मात्र आज घडीला ही संख्या ३ हजार १६७ झाली आहे. देशभरात ५३ व्याघ्र प्रकल्प आहेत.
  • देशातल्या वाघांची संख्या जगातल्या वाघांच्या संख्येच्या तुलनेत ७० टक्के अधिक आहे. मात्र आजही वाघांवर संकट आहे. वाघाचं रक्षण करायचं असेल तर जंगल आणि इतर जिवांचं रक्षण करणं आवश्यक आहे.
  • याआधी २००८ मध्ये वाघांची संख्या १४०१ होती. त्यानंतर वाघांचं संवर्धन करण्यासाठी मोहीम चालवण्यात आली. यानंतर आता ही संख्या ३ हजार १६७ इतकी झाली आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनीही वाघ वाचवण्याच्या मोहिमेत सहभाग घेतला होता. तसंच वाघ वाचवण्याच्या संरक्षण मोहिमेत इतरही अनेक नामवंत लोक सहभागी झाले. त्यामुळे आज वाघांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येते आहे.
  • १ एप्रिल १९७३ ला इंदिरा गांधी यांनी हा प्रोजेक्ट टायगर सुरू केला होता. वाघ वाचवण्यासाठी ही मोहीम होती. कारण तेव्हा भारतात २६८ वाघ उरले होते. १९ व्या शतकाच्या सुरूवातीला भारतात ४० हजार वाघ होते. मात्र १९७३ मध्ये ही संख्या २६८ इतकीच उरली होती. त्यामुळे ही संख्या वाढवण्यासाठी टायगर प्रोजेक्ट सुरू करण्यात आला. २००६ मध्ये १४११ एवढी वाघांची संख्या झाली. तर २०१० मध्ये ही संख्या १७०६ इतकी झाली. २०१४ मध्ये ही संख्या २२४६ झाली. तर २०१८ मध्ये वाघांची संख्या २९६७ इतकी झाली होती.
तोतया ‘पीएमओ अधिकाऱ्या’च्या शैक्षणिक पदव्यांची चौकशी
  • जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या महिन्यात अटक करण्यात आलेल्या किरण पटेलची शैक्षणिक अर्हता गुजरात पोलिसांची अहमदाबाद गुन्हे शाखा तपासणार आहे. पटेल जम्मू-काश्मीरमध्ये पंतप्रधान कार्यालयाचा अधिकारी म्हणून वावरत होता. पटेल तोतया असल्याचे उघड झाल्यानंतर त्याला पकडण्यात आले होते. शनिवारी पहाटे त्याला गुजरातमध्ये आणण्यात आले.
  • पटेल हा आपण संगणक अभियंता असल्याचा दावा करत आहे. तसेच एका जाहिरात कंपनीसाठी भारतात व परदेशात काम केल्याचाही दावा त्याने केल्याची माहिती अहमदाबाद गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त चैतन्य मंडलिक यांनी दिली. मंडलिक म्हणाले, की त्याचे हे दावे आम्ही तपासून पाहणार आहोत. त्याच्या शैक्षणिक पदव्या बनावट असल्याचे आढळल्यास त्याच्याविरुद्ध नव्याने गुन्हा दाखल करणार आहोत.
  • गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार पटेलने अहमदाबाद येथून संगणक अभियांत्रिकीची पदविका मिळवल्याचा दावा केला आहे. त्यानंतर त्याने अहमदाबादच्या अग्रगण्य अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमही पूर्ण केल्याचा दावा केला आहे. तमिळनाडूच्या त्रिची येथील ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट’मधून २०२१-२२ मध्ये पटेलने कार्यकारी ‘एमबीए’चा एक वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचाही दावा केला आहे.
  • पटेलने पोलिसांना सांगितले, की तो अहमदाबादमधील एका जाहिरात कंपनीत ‘प्रोग्रामर’ म्हणून काम करत होता. तेथे त्याने राजकीय पक्षांच्या जाहिराती आणि संकेतस्थले विकसित केली आणि येथेच त्याने राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची आणि प्रकल्पांची माहिती गोळा केली.
NASA वायूप्रदुषणाचे मोजमाप अंतराळातून कशासाठी?
  • जगातील प्रथितयश अंतराळ संशोधन संस्था असलेल्या ‘नासा’ने शुक्रवारी स्पेसएक्स फाल्कन नाइन या अंतराळ यानासोबत वायूप्रदुषणाचे मापन करणारी यंत्रणा थेट अंतराळात धाडली असून ‘पृथ्वीवरील मानवी जीवन खऱ्या अर्थाने अधिक समृद्ध करण्यासाठी’ असे त्या उपक्रमाचे वर्णन केले आहे.
  • काय आहे नेमका हा उपक्रम? कशा पद्धतीने केले जाणार आहे हे मापन आणि ते थेट अंतराळातूनच करण्यामागचे कारण काय?
ऐतिहासिक क्षण! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची लढाऊ ‘सुखोई 30’ मधून उत्तुंग भरारी
  • भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज आसामच्या तेजपूर एअरफोर्स स्टेशनवरून सुखोई ३० या लढाऊ विमानाने आकाशात उत्तुंग भरारी घेतली. इतिहासात नोंद केली जावी असाच हा क्षण होता. राष्ट्रपती तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुख असतात. त्यांनी ३० मिनिटं भरारी घेतली त्यानंतर हिमालय आणि ब्रह्मपुत्र तसंच तेजपूर खोरं हे त्यांनी आकाशातून पाहिलं.
  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी ज्या सुखोई ३० या विमानातून भरारी घेतली ते विमान ग्रुप कॅप्टन नवीन कुमार यांनी चालवलं. ८०० किमी प्रतितास या वेगाने हे विमान चालवण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अशा प्रकारे सुखोईतून उत्तुंग भरारी घेणाऱ्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत.

उड्डाणानंतर काय म्हटलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी?

  • व्हिजिटर्स बुकमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी त्यांचा अभिप्राय लिहिला. “भारतीय वायू सेनेच्या सुखोई ३० या लढाऊ विमानातून उड्डाण करणं हा माझ्यासाठी एक अत्यंत उत्साह वाढवणारा अनुभव होता. मला अभिमा आहे की भारतात अशा प्रकारची लढाऊ विमानं आहेत. लष्कर, वायूदल आणि नौदल या तिन्ही दलांनी मोठा विस्तार केला आहे. भारतीय वायुसेना आणि तेजपूर वायूसेना स्टेशन यांच्या सगळ्या पथकाचे मी आभार मानते. अशा शब्दांमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उड्डाण करण्याच्या आधीपासून त्या उड्डाण करून परत येईपर्यंत ज्या ज्या सगळ्या गोष्टी घडल्या त्या सगळ्याची माहिती त्यांना आधी देण्यात आली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी वायुसेनेच्या तयारीबाबत समाधान व्यक्त केलं तसंच आपल्यासाठी हा अनुभव खूप उत्साह वाढवणारा होता असंही त्यांनी म्हटलं आहे. मार्च २०२३ मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी INS विक्रांतचा दौरा केला होता. त्यावेळी भारतात निर्मिती करण्यात आलेल्या विमानांची त्यांनी माहिती घेतली. तसंच नौदल अधिकाऱ्यांशी चर्चा ही केली होती.

10 एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.