चीनमधील वुहान व हुबई प्रांतांत सुरू झालेले करोना साथीचे थैमान आता जगभरातील १८० हून अधिक देशांमध्ये पसरले आहे. मात्र ७६ दिवसांनंतर बुधावारी पहिल्यांदाच वुहानमधील सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. येथे करोनाचे नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण अगदी शून्यावर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे वुहानमधील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. येथे राहणाऱ्या भारतीयांनाही लॉकडाउनचे निर्बंध हटवण्यात आल्यानंतरसुटकेचा निश्वास सोडला आहे. निर्बंध उठवण्यात आल्यानंतर काही जणांनी आपल्या मायदेशी परत जाण्याचा निर्णय घेतला आहे. असं असलं तरी दुसरीकडे भारतातील केरळ राज्यामधील अनीला पी अजयन या मुलीने परत न येता तिथेच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
“माझ्या माध्यमातून हा विषाणू भारतात येऊ नये असं मला वाटतं, म्हणूनच मी भारतात परत न येण्याचा निर्णय घेतला आहे,” असं येथील चायनीज अकॅडमी ऑफ सायन्समधील हायड्रोबायलोजी इन्सटीट्यूटमध्ये (आयबीएच) डॉक्टरेटचं शिक्षण घेणाऱ्या अनीला हिने ‘द न्यू इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सांगितलं.
सध्या येथील निर्बंध उठवण्यात आल्याने येथे एकप्रकारे आनंद साजरा केला जात आहे. “येथे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सध्या आनंद दिसत आहे. मात्र प्रत्येकजण सतर्क आहे,” असं अनीला सांगते. अनीलाही मूळची केरळमधील पठाणमथिट्टा येथील इलावुमथिट्टा येथील आहे.
“मागील तीन महिन्यापासून मला वुहानमध्ये केवळ रुग्णवाहिकांच्या सायरन आणि चीनी भाषेतील रेडीओ मेसेजेसचाच आवाज ऐकू येत होता. मी येथे भेटलेले अनेक लोकं मला निराश दिसत होती. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. आता सर्वजण आनंदी आहेत. सर्वजण जरा शांत झाले आहे. रस्त्यांवर पुन्हा लोकं दिसू लागली आहेत. आमच्या इन्स्टीट्यूटमध्ये विद्यार्थीही परत येऊ लागलेत,” असं अनीलाने आपले अनुभव कथन करताना सांगितलं.
दिल्ली उच्च न्यायालयाने यंदा १ ते ३० जून या कालावधीतील उन्हाळ्याची सुटी स्थगित करण्याचा निर्णय गुरुवारी घेतला. करोनाच्या फैलावामुळे देशात संचारबंदी जारी करण्यात आल्याने प्रलंबित कामकाजाची भरपाई करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे दिल्ली उच्च न्यायालयाने अन्य संबंधित न्यायालयांच्या उन्हाळ्याच्या सुटीलाही स्थगिती दिली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. एन. पटेल आणि अन्य न्यायाधीशांनी हा निर्णय घेतला आहे.
देशात संचारबंदी जारी करण्यात आल्याने याचिकाकर्त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. उच्च न्यायालयात १६ मार्चपासून केवळ तातडीच्या प्रकरणांवरच सुनावणी घेतली जात आहे.
भारताप्रमाणे अन्य शेजारचे देशही करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहेत. भारताने या देशांना मदत पाठवायला सुरुवात केली आहे. सध्याच्या घडीला अत्यंत महत्वाचे ठरणारे हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन हे औषध भारताने या देशांना पाठवले आहे. साऊथ ब्लॉकमधील अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली. हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन ही गोळी करोना व्हायरसवर अत्यंत प्रभावी ठरत आहे. अमेरिकेने याच औषधाच्या निर्यातीसाठी भारतावर दबाव टाकला होता.
भारताने भूतान, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ, म्यानमार, सेशेल्स, मॉरिशेस आणि अन्य आफ्रिकन देशांना औषधे पाठवली आहेत. मंगळवारी एअर इंडियाच्या विमानातून १० टन औषधे श्रीलंकेमध्ये पोहोचवण्यात आली. शेजारी देशांना पाठवलेल्या औषधांमध्ये पॅरासीटेमॉल आणि हायड्रोक्सी क्लोरोक्वाईनचा समावेश आहे.
अमेरिका, स्पेन, ब्राझील, बहरीन, जर्मनी आणि यूके या देशांनी भारतीय औषध कंपन्यांबरोबर करार केले होते. Covid-19 वरील उपचारांसाठी या देशांना औषध निर्यात करण्यालाही भारत सरकारने मंजुरी दिली आहे. हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन या औषधाच्या निर्यातीला परवानगी दिल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीयांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
चीनमध्ये उद्रेक झाल्यानंतर करोना विषाणु जगभर पोहोचला. करोनाच्या संसर्गामुळे इटली आणि अमेरिकेची अवस्था बिकट झाली आहे. इटलीमध्ये सर्वाधिक म्हणजे १७ हजार ६६९ जणांचा मृत्यू झाला असून एक लाख ३९ हजार ४२२ जणांना करोनाची लागण झाली आहे.
अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे चार लाख ३२ हजार १३२ जणांना करोनाची लागण झाली असून त्यापैकी १४ हजार ८१७ जणांचा मृत्यू झाला आहे. गुरूवारी भारतातील मृतांचा आकडा १६६ वर पोहोचला. महाराष्ट्रातील विशेष मुंबईतील परिस्थिती गंभीर असून, करोनाग्रस्त रुग्ण आणि मृतांची संख्या सर्वाधिक आहे.
देशव्यापी टाळेबंदीच्या सोळाव्या दिवशी, गुरुवारी देशात नवे ५४९ करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे देशभरात आतापर्यंत करोनाच्या रुग्णांची संख्या ५७३४ झाली आहे.
देशातील मृतांचा आकडा १६६ वर पोहोचला आहे. आतापर्यंत ४७३ रुग्णांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आले, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी गुरुवारी दिली.
करोनाच्या आतापर्यंत १ लाख ३० हजार जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यापैकी ५७३४ करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. गेल्या दोन महिन्यांतील एकूण चाचण्यांपैकी करोनाबाधितांची संख्या तीन ते पाच टक्के असून, त्यात फारसा बदल झालेला नसल्याचे अगरवाल यांनी सांगितले.
पीपीई, मास्क, कृत्रिम श्वासोच्छ्वास यंत्रे यांचा पुरवठा सुरूच आहे. एकूण १.७ कोटी पीपीई आणि ४९ हजार कृत्रिम श्वासोच्छ्वास यंत्रे मागवण्यात आली आहेत. करोनाच्या रुग्णांवर उपचार करत असलेले डॉक्टर, परिचारिका यांना वरील तिन्ही वैद्यकीय साधनांची मोठय़ा प्रमाणावर कमतरता भासत आहे. देशातील २० उत्पादकांकडून या साधनांची खरेदी केली जाणार आहे.
कोविड -१९ विरोधात सुरू असलेल्या मानवतेच्या लढाईत भारत सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करेल असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिले.
भारताने अमेरिकेच्या मागणीनुसार मलेरियावर उपयुक्त असणारे हायड्रोक्सीक्लोरोक्विन औषधांचा साठा अमेरिकेला पाठवल्यानंतर ट्रम्प यांना करोनाविरुद्धच्या मानवतेच्या लढाईत भारताने केलेल्या सहकार्याबद्दल भारताचे आभार मानले.
ट्रम्प यांनी केलेल्या आभाराच्या ट्वीटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले की, मी आपल्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. अशा प्रकारची कठीण परिस्थितीच मित्रांना जवळ आणते. भारत आणि अमेरिकेचे मैत्रीपूर्ण संबंध पूर्वीच्या काळाच्या तुलनेत अधिक सौहार्दाचे आणि मजबूत आहेत. कोविड -१९ विरोधात सुरू असलेल्या मानवतेच्या लढाईत भारत सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करेल आणि दोन्ही देश मिळून ही लढाई जिंकतील असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला आहे.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.