चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पीएम मोदी राहणार उपस्थित, सोबत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधानही असणार
- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबाद येथे होणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर ९ मार्चपासून दोन्ही संघांमध्ये हा सामना रंगणार आहे. हा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार आहेत. त्यांच्यासोबत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हेही स्टेडियममध्ये उपस्थित राहणार आहेत. दोघेही कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या खेळाचा आनंद लुटतील.
- ऑस्ट्रेलियन उच्चायुक्त बॅरी ओ’फॅरेल म्हणाले, “क्रिकेट ही दोन देशांना जोडणारी एक गोष्ट आहे. अहमदाबादमध्ये सामन्याच्या दिवशी भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना सामना बघताना पाहणे खूप आनंददायी ठरेल.”
- भारताला चौथी कसोटी जिंकणे आवश्यक - चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ २-१ ने पुढे आहे. टीम इंडियाने नागपुरातील पहिली कसोटी एक डाव आणि १३२ धावांनी जिंकली होती. त्यानंतर दिल्ली कसोटी ६ गडी राखून जिंकली. तिसरा सामना इदोरमध्ये पार पडला, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियन संघाने ९ गडी राखून विजय मिळवला. त्याचबरोबर मालिकेत पुनरागमन केले. चौथी कसोटी जिंकणे भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचायचे असेल, तर भारताला ही कसोटी जिंकावीच लागेल. जर टीम इंडिया हा सामना हरला, तर न्यूझीलंडविरुद्ध श्रीलंकेच्या पराभवाची प्रार्थना करावी लागेल.
एका सुंदर सापाच्या प्रजातीला मिळाले विदेशात अस्तित्व; भारतीय संशोधकांचाही मोलाचा वाटा
- तुर्कमेनिस्तान देशातून नुकत्याच एका सुंदर सापाच्या प्रजातीला त्याचे अस्तित्व मिळवून देण्याचे काम वन्यजीव संशोधकांनी केले आहे. या संशोधनामध्ये ११ देशांमधील विविध संशोधकांचा समावेश आसून, भारतामधून अमीत सैय्यद, विवेक शर्मा, एस. आर. गणेश, तसेच एच. टी. लारेमसंगा यांचा मोलाचा वाटा आहे.
- ‘लायकोडॉन बायकलर’ असे याचे नाव असून, हा ‘लायकोडॉन’ कुळातील साप आहे. या कुळातील सापांना इंग्रजीत ‘उल्फ स्नेक्स’, तर मराठीत ‘कवड्या’ जातीचा साप म्हणतात.
- ‘लायकोडॉन’ कुळात आतापर्यंत ७३ प्रजातींच्या सापांची नोंद आहे. ‘लायकोडॉन बायकलर’ हा पूर्वी ‘लायकोडॉन स्टेयेटस’ नामक एका प्रजातीच्या नावाने ओळखला जात होता. भारत, अफगाणिस्तान, इराण, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, तसेच तुर्कमेनिस्तान या देशांमध्ये या सापाची नोंद असल्याचे नमूद केले गेले होते. भारतातील तसेच इतरही देशांतील काही वन्यजीव संशोधक ‘लायकोडॉन’ या सापांवर गेली कित्येक वर्षे अभ्यास करीत होते. या अभ्यासात विविध देशांमध्ये असलेले सापांचे नमुने अभ्यासणे, त्यांच्या नोंदी घेणे, जनुकीय चाचण्या करणे, असे सर्व शास्त्रीय परीक्षण करण्यात आले.
नेफ्यू रियो पाचव्यांदा नागालँडच्या मुख्यमंत्रीपदी
- ‘नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी’चे (एनडीपीपी) नेते नेफ्यू रियो यांनी मंगळवारी पाचव्यांदा नागालँडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल ला गणेशन यांनी ७२ वर्षीय रियो यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
- ‘एनडीपीपी’चे टी. आर. झेलियांग व भाजपचे वाय. पॅटन यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. रियो यांच्या मंत्रिमंडळातील इतर सदस्यांनीही शपथ घेतली. मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आपल्या विनोदी शैलीने समाजमाध्यमांवर लोकप्रिय असलेले तेमजेन इम्ना अलॉन्ग व नागालँड विधानसभेवर प्रथमच निवडून आलेल्या दोन महिलांपैकी एक सलहौतुओनुओ क्रूस यांचा समावेश आहे. क्रूस आणि हेकानी जाखलू प्रथमच नागालँड विधानसभा सदस्यपदी निवडून आल्या आहेत.
- यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि आसामचे मुख्यमंत्री व ईशान्य लोकशाही आघाडीचे (एनईडीए) निमंत्रक हिमंता बिश्व शर्मा उपस्थित होते. रियो यांच्या मंत्रिमंडळात ‘एनडीपीपी’चे सात आणि भाजपचे पाच मंत्री आहेत. क्रूस आणि पी. बाशंगमोनबा हे फक्त दोन मंत्रिमंडळातील नवीन चेहरे आहेत.
आकाशाला गवसणी घालणारी कॅप्टन कृतज्ञा
- पारंपारिक मासेमारी व्यवसायाला फाटा देत तिने लहानपणापासूनच आकाशात उंच उडण्याचे स्वप्न उरी बाळगले होते. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने आपले स्वप्न प्रत्यक्षात साकारले. अनेक अडचणींवर मात करत तिने आज एक यशस्वी वैमानिक म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे. आज अलिबाग तालुक्यातील ग्रामीण भागातील मुलींसाठी कॅप्टन कृतज्ञा खऱ्या अर्थाने प्रेरणा स्त्रोत बनली आहे.
- अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील कॅप्टन कृतज्ञा हाले हिने लहानपणापासूनच वैमानिक होण्याचे स्वप्न पाहिले होते. २००९ तिने साळाव येथील इंग्रजी माध्यम शाळेत बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने थेट फिलिपिन्सला जाण्याचा निर्णय घेतला. वयाच्या सोळाव्या वर्षी तिने घर सोडले. हा निर्णय धाडसी होता. पण आई वडील दोघेही तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहीले.
- परदेशात वैमानिक प्रशिक्षण घेतांना तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. पण ती डगमगली नाही. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने वैमानिक बनण्यासाठी आवश्यक चार वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने भारतात परतण्याचा निर्णय घेतला. नागरी उड्डयन विभागाकडे वैमानिक परवान्यासाठी अर्ज केला. पाच वर्ष पाठपुरावा केल्यानंतर तिला अखेर वैमानिक परवाना प्राप्त झाला. त्यानंतर गो एअरवेझ कंपनीत वैमानिक पदावर ती रुजू झाली. पाच वर्षांची तपश्चर्या फळाला आली. यानंतर तीने कधीच मागे वळून पाहीले नाही.
- आज प्रथितयश वैमानिक म्हणून ती नावारुपास आली आहे. देशविदेशात विमाने उडविण्याचा प्रदीर्घ अनुभव तिच्या पाठीशी आहे. अनेक आव्हानांना सामोरे जात तिने हे यश संपादित केले आहे. हवामानात होणारे बदल, विमानाच्या तांत्रिक बाबी याचे सखोल ज्ञान तिने आत्मसात केले. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत विमानांची हाताळणी करण्याचे कसब आत्मसात केले. आज या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणींसाठी ती रोल मॉडेल आहे. अनेक तरुणींसाठी ती मार्गदर्शक म्हणूनही कार्यरत आहे. कोळी समाजातील पहिली महिला वैमानिक म्हणूनही ती ओळखली जात आहे.
चालू घडामोडी आणि दिनविशेष - 08 मार्च 2022
विश्वचषक नेमबाजी स्पर्धा - रिदम-अनिष जोडीला सुवर्ण :
-
भारताच्या रिदम सांगवान आणि अनिष भानवाला या जोडीने आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत अखेरच्या दिवशी २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल मिश्र सांघिक गटात सुवर्णपदक आपल्या नावे केले.
-
सोमवारी रिदम-अनिष या जोडीने सुवर्णपदकाच्या लढतीत थायलंडच्या पादुका चाविसा आणि राम खांहाएंग या जोडीला १७-७ अशी धूळ चारली. त्यांच्या या कामगिरीमुळे विश्वचषकाअखेरीस भारताने चार सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य अशा सात पदकांसह पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले.
-
रिदम-अनिष या जोडीने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल मिश्र सांघिक गटातील पात्रतेच्या दुसऱ्या फेरीत ४०० पैकी ३७० गुणांसह दुसरे स्थान मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. थायलंडच्या चाविसा आणि खांहाएंग जोडीने ३८१ गुणांसह अग्रस्थान कमावले होते. मात्र, सुवर्णपदकाच्या लढतीत त्यांना या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यात अपयश आले. भारताच्या इशा सिंग आणि भावेश शेखावत या जोडीनेही पात्रतेची दुसरी फेरी गाठली होती; परंतु त्यांना ३५६ गुणांसह पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
-
त्याआधी भारताने पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात रौप्यपदक जिंकले होते. सुवर्णपदकाच्या लढतीत जर्मनीच्या ख्रिस्टियन रित्झ, गेस ऑलिव्हर आणि पीटर फ्लोरियन या त्रिकुटाने भारताच्या गुरप्रीत सिंग, अनिष आणि भावेश शेखावत या त्रिकुटावर मात केली. कैरो येथे झालेल्या या विश्वचषकात ६० देशांच्या ५०० हून अधिक नेमबाजांचा सहभाग होता. एकूण २२ देशांना या स्पर्धेत पदक जिंकण्यात यश आले. गुणतालिकेत भारताने चार सुवर्णपदकांसह अव्वल, नॉर्वेने तीन सुवर्णपदकांसह (एकूण सहा पदके) दुसरा, तर फ्रान्सने तीन सुवर्णपदकांसह तिसरा क्रमांक पटकावला.
राज्यात करोनाचे २२५ नवे रुग्ण ; एप्रिल २०२० नंतर प्रथमच दैनंदिन रुग्णसंख्येत एवढी घट :
-
राज्यात सोमवारी २२५ रुग्ण नव्याने आढळले असून एप्रिल २०२० नंतर प्रथमच दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. राज्यात दुसऱ्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.
-
करोनाची तिसरी लाट पूर्णपणे ओसरत आली असून दैनंदिन रुग्णसंख्येसह मृतांचा आलेखही वेगाने खाली जात आहे. करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर रुग्णसंख्या कमी झाली तरी अडीचशेच्या खाली कधीच गेली नव्हती, तर मृतांचे प्रमाणही शून्य झाले नव्हते. तिसऱ्या लाटेनंतर मात्र करोनाचा प्रादुर्भाव वेगाने कमी होत असून पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षाही दैनंदिन रुग्णसंख्येत घट होत आहे.
-
राज्यात २२५ नवे रुग्ण आढळले आहेत. एप्रिल २०२० पासून दैनंदिन रुग्णसंख्येत मोठय़ा प्रमाणात चढउतार होत होते. परंतु प्रथमच एवढी कमी रुग्णसंख्या झाली आहे. राज्यात सोमवारी मुंबई, नगर आणि पुणे वगळता अन्य सर्व जिल्ह्यांमध्ये पाचपेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. राज्यात सोमवारी एकही करोना मृत्यू नाही.या महिन्यात राज्यात दुसऱ्यांदा शून्य मृत्यू आढळले आहेत.
-
मुंबईत ३८ नवे रुग्ण मुंबईत सोमवारी ३८ नवे रुग्ण आढळले असून एप्रिल २०२० नंतर प्रथमच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाली आहे. तसेच सोमवारी शहरात शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत मार्चमध्ये केवळ रविवार वगळता अन्य सर्व दिवस शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.
सोलापुरात पदव्युत्तर शिक्षणामध्ये मुलांपेक्षा मुलीच आघाडीवर :
-
कालानुरूप घडलेल्या सामाजिक बदलांमुळे मुलांच्या बरोबरीनेच नव्हे तर त्यांच्याही पुढे झेप घेऊन मुलींची वाटचाल सुरू आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातही मागील पाच वर्षांत हे आश्वासक चित्र पाहायला मिळते. देशात शंभर वर्षांपूर्वी महिलांना दुय्यम स्थान तर होतेच, शिवाय शिक्षणाचे धडेही त्यांना दिले जात नव्हते.
-
क्रांतिज्योती महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आदी महापुरुषांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. प्रतिकूल परिस्थितीत टप्प्या-टप्प्याने महिला शिक्षण घेऊन पुढे येत राहिल्या. अलीकडे तर संपूर्ण जगात कार्यकर्तृत्व गाजविणाऱ्या महिलांची नावे सर्व परिचित झाली आहेत. शिक्षणात तर महिलांची झेप सुरूच आहे.
-
मागील पाच वर्षांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कॅम्पसमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी मुलांपेक्षा मुलींनी अधिक प्रमाणात प्रवेश घेतला आहे. यात २०१६-१७ ते २०२०-२१ या पाच वर्षांच्या शैक्षणिक कार्यकाळात एकूण २६९५ मुले तर २८७९ मुलींनी यशस्वी पद्धतीने उच्चशिक्षण घेतले आहे. १८४ संख्येने मुलींची संख्या अधिक आहे.
-
जागतिक महिला दिन साजरा होत असताना त्याच्या पूर्वसंध्येला हे सकारात्मक आणि आश्वासक चित्र समोर आहे. विशेषत: रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, संगणकशास्त्र, विज्ञान आणि अर्थशास्त्र आदी महत्त्वाच्या पदव्युत्तर ज्ञानशाखांकडे मुलींचा ओढा वाढला आहे.
मदतीबद्दल युक्रेनकडून भारताचे आभार ; झेलेन्स्की-मोदी यांचा दूरध्वनीवर संवाद :
-
रशियाने आपल्या देशावर केलेल्या आक्रमणाचा प्रतिकार करण्याच्या आवश्यकतेबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती दिली असून, युक्रेनच्या लोकांना मदत देणे सुरू ठेवल्याबद्दल भारताचे आभार मानले आहेत, असे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सोमवारी सांगितले.
-
झेलेन्स्की यांनी सुमारे ३५ मिनिटे मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधल्यानंतर ट्विटरवर याबाबत माहिती दिली.
-
‘युद्धकाळात आपल्या नागरिकांना केलेल्या मदतीचे, तसेच सर्वोच्च स्तरावर शांततामय संवाद साधण्याबाबत युक्रेनच्या बांधिलकीचे भारत कौतुक करतो. युक्रेनी लोकांच्या मदतीसाठी आम्ही कृतज्ञ आहोत. रशियाला थांबवा,’ असे झेलेन्स्की यांनी लिहिले.
-
युक्रेनच्या आग्नेयेकडील सुमी शहरात अडकून पडलेल्या भारतीयांच्या स्थलांतरासाठी मोदी यांनी झेलेन्स्की यांची मदत मागितली, तसेच युक्रेनमधील संघर्ष निवळण्यासाठी तेथील हिंसाचार तात्काळ थांबवण्याच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला.
भारताचे पॅलेस्टाईनमधील राजदूत मुकुल आर्या यांचे निधन :
-
भारताचे पॅलेस्टाईनमधील राजदूत मुकुल आर्या यांचे रविवारी रामल्लाह येथे निधन झाले, अशी माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ट्विटरवर दिली.
-
जयशंकर यांनी म्हटले आहे की, ‘‘आर्या यांच्या निधनामुळे आपणास धक्का बसला आहे. ते अत्यंत कर्तबगार अधिकारी होते.
-
’’ त्यांनी दिल्लीत परराष्ट्र खात्यात तसेच युनेस्कोत भारताच्या कायमस्वरूपी शिष्टमंडळात, त्याचप्रमाणे भारताच्या काबूल आणि मॉस्को दुतावासात काम केले होते. पॅलेस्टाईनच्या परराष्ट्र खात्याने त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.